You are currently viewing श्री हरितालिकेची कहाणी

श्री हरितालिकेची कहाणी

एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. 

पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतांत चागलं व्रत कोणतं ? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या आपल्या पदरी पडले, हेही मला सांगा.” 

तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस.

हे व्रत भाद्रपद्र महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं, म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणास द्यावी, अशी चिंता पडली. 

इतक्यात नारदमुनी आले. त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. 

तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे.” 

हिमालयाला खूप आनंद झाला. नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. 

तू रागावलीस. महादेवावाचून दुसरा पती करायचा नाही, हा तुझा निश्चय तू सखीला सांगितलास. 

दोघी अरण्यात आलात. नदीकाठी गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस. त्याची मनोभावे पूजा केलीस. 

भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता. रात्री जागरण केलंस त्या पुण्यान इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितलं. 

तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, एवढीच इच्छा आहे.” नंतर ती गोष्ट मी मान्य केली. 

दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. वडिलांना तू सर्व हकीगत सांगितली. तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. 

या हरतालिका व्रताचा विधी असा आहे. “ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब, फुले, माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करावं. रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो. सात जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं, ह्या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत. कहाणी केल्यावर सुवासिनींना यशाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करून व्रताचं विसर्जन करावं.”

ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवा-ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफल संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा