You are currently viewing ऋषिपंचमीची कहाणी

ऋषिपंचमीची कहाणी

ऋषिश्वरांनो, तुमची कहाणी ऐका. 

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. शेती-भाती करून सुखानं नांदत होता. 

पुढं एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. 

त्या दोषामुळे तिचा पती पुढील जन्मी बैल झाला; तर तिला कुत्रीचा जन्म मिळाला. 

दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. मुलगा धार्मिक वृत्तीचा होता. देवधर्म, श्राद्धपक्ष करी. घरी आलेल्या ब्राह्मणांचा योग्य तो सत्कार करी.

एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. त्यानं आपल्या पत्नीला खीरपुरीचा सैंपाक करण्यास सांगितला. ती मोठी पतिव्रता होती. तिनं सर्व सुग्रास स्वयंपाक केला. पण खिरीचं भांड उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. 

हे त्या कुत्रीनं पहिलं. तिच्या मनात विचार आला, ब्राह्मण ही खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून ती पटकन उठली. जाऊन त्या खिरीच्या पातेल्याला शिवली. 

ब्राह्मणाच्या पत्नीला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं ते कुत्रीच्या कंबरेत मारलं. तो सैंपाक टाकून दिला व पुन्हा सैंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला काही उष्ट-माष्टदेखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला.

रात्र झाली, तेव्हा ती कुत्री आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ गेली. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 

“दिवसभर उपास आणि माझं सारं अंग दुखत आहे. ह्याला मी काय करू ?” असे रडत विचारू लागली. 

बैलानं तिला उत्तर दिलं, “तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मीदेखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं.” 

हे भाषण मुलानं ऐकलं. तेव्हा तो बाहेर आला. बैलाला चारा व कुत्रीला अन्न घातलं. दोघांना पाणी प्यायला दिलं. मनातून मात्र फारच दुःखी झाला.

दुसरे दिवशी अरण्यात गेला. तिथं ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला तू असा दुःखी-कष्टी का ?” असं विचारलं. 

मुलानं सांगितलं, “माझ्या वडिलांना बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा. त्यांना मोक्ष कसा मिळेल ? कृपा करून मला उपाय सांगा.”

तेव्हा ऋषींनी त्याला ऋषिपंचमीचं व्रत करण्यास सांगितलं.

हे व्रत कसं करावं ? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पाखांतील पंचमी येते. त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून, तीळ वाटून घेऊन केसांना लावावे. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्रे नेसावीत. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. 

या व्रतानं रजस्वलादोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लाभतं. दानाचं पुण्य लागतं. मनी इच्छिलेलं कार्य पूर्ण होतं.

मुलानं हे व्रत केलं. त्याचं पुण्य त्याने आपल्या आई-वडिलांना दिलं. त्या पुण्यानं रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता, तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती, ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली.

मुलानं ऋषीपंचमीचं व्रत मोठ्या श्रद्धेनं केलं; त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा-आमचा होवो. 

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा