You are currently viewing ज्येष्ठागौरीची कहाणी

ज्येष्ठागौरीची कहाणी

आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. 

भाद्रपद महिना आला. घरोघरी गौरी आणल्या. मुले आईला म्हणाली, “आपल्या घरी गौरी आण.”

आई म्हणाली, “गौरीची पूजा-अर्चा केली पाहिजे. तिला घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. घरात तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जाऊन सामान आणायला सांगा. सामान आणलं, म्हणजे गौरी आणीन.” 

मुलांनी बाबांना सांगितलं. गरीबीमुळे मुलांचा हट्ट पुरविता येत नाही; म्हणून ब्राह्मण अतिशय दु:खी कष्टी झाला व जीव द्यायला निघाला. देवाचा धावा केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. 

जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची विचारपूस केली. ब्राह्मणानं हकीगत सांगितली. म्हातारीनं त्याला समजावून सांगितलं, “मनुष्यदेह हा त्यागण्यासाठी नाही; तर त्याचं सार्थक करावं.”

ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. ब्राह्मणाला बायकोनं विचारलं, तेव्हा आजी आहेत म्हणून सांगितलं.

बायको आंबिलीकरिता कण्या पाहू लागली, तर मडकं आपलं कण्यांनी भरलेलं. तिला आश्चर्य वाटलं. तिनं नवऱ्याला सांगितलं. त्याला खूप आनंद झाला. पुष्कळ पेज केली. सर्वांनी पोटभर खाल्ली. आनंदानं झोपी गेली.

सकाळ होताच म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली, “मुला, मुला, मला न्हाऊ घालायला सांग. घावन-घाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको. रडगाणं गाऊ नकोस.” त्याने बायकोला सांगितले. 

त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली. सगळं सामान आणलं. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. सर्वजण मिळून जेवली. 

म्हातारीनं ‘उद्या जेवायला खीर कर,’ म्हणून सांगितलं.

“आजी, दूध कोठून आणू?” 

असं ब्राह्मणानं विचारताच ती म्हणाली, “तू काही काळजी करू नको. तुला जितक्या गायी-म्हशी पाहिजे असतील, तितके खुंटे पूर. दावी बांध, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गायी-म्हशीची नावं घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ.” 

ब्राह्मणानं तसं केलं. हाका मारताच गोठा गायी-म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. 

संध्याकाळी म्हातारी म्हणाली, “मुला, मला आता पोहोचती कर.” 

ब्राह्मण म्हणू लागला, “आजी, तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोहोचत्या कशा करू ? तुम्ही गेला, म्हणजे हे सर्व नाहीसं होईल.” 

म्हातारी म्हणाली, “तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौरी म्हणतात, ती मीच. आज मला पोहोचती कर.” 

ब्राह्मण म्हणाला, “हे दिलेलं असंच वाढावं, असा काही उपाय सांगा.” 

गौरीने सांगितले, “तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. गोठ्यात टाक. असं केलं, म्हणजे कधी कमी होणार नाही.” 

ब्राह्मणानं तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. 

भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावेत. ऊन पाण्यानं धुवावेत. ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदी-कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे अक्षय सुख मिळते. संतती-संपत्ती लाभते.

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी. देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा