जैन धर्मात २४ तीर्थंकरांना मानले जाते. त्यातले चोविसावे म्हणजेच शेवटचे आणि आज सर्वात जास्त माहिती असलेले तीर्थंकर म्हणजे वर्धमान महावीर. तीर्थंकर म्हणजे मार्ग दाखवणारे.
त्यांचा जन्म आजच्या बिहारमध्ये येणाऱ्या पटण्याजवळच्या कुंडग्राम नावाच्या गावी इ.स.पु. ५९९ मध्ये वैशाली गणतंत्राचे राजे सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. वर्धमान हे त्यांचे मुळ नाव होते.
जैन धर्मात अहिंसेचे महत्व खुप आहे. मग अहिंसेला मानणाऱ्या धर्मामध्ये एखाद्याला महावीर म्हणुन कसे काय पुजले जाते?
त्याची कथा अशी आहे, कि संगमदेवांनी वर्धमानाची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते वर्धमानासमोर सर्प रूपात प्रकट झाले. एक अजस्त्र साप बघुनही वर्धमानाच्या मनात हा मला चावेल किंवा अपाय करेल अशी भीती उत्पन्न नाही झाली.
उलट वर्धमानाने आपल्या शक्तीने सापाच्या मनातली हिंसाच काढुन टाकली. स्वतः हिंसा न करता किंवा दुसऱ्याच्या हिंसेला न घाबरता सामोरे जात त्याच्या मनातली हिंसा दूर करणे, हि देखील एक वीरता आहे. त्यामुळे वर्धमान हे महावीर म्हणुन ओळखले जाऊ लागले.
महावीरांनी आईवडिलांच्या इच्छेखातर यशोदेशी लग्न केले होते, आणि त्यांना दर्शना नावाची मुलगीही होती. पण पुढे त्यांनी वैराग्य घेऊन तपश्चर्या करून ज्ञान साधना केली आणि केवल-ज्ञान प्राप्त केले.
पुढे आयुष्यभर त्यांनी लोकांना जैन धर्माच्या तत्वांबद्दल उपदेश केला. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय आणि अपरिग्रह हि पाच मुख्य व्रते त्यांनी सांगितली.
अस्तेय म्हणजे चोरी न करणे, आणि अपरिग्रह म्हणजे भौतिक वस्तूंचा कुठलाही मोह न ठेवणे.
महावीरांचा जन्म चैत्र शुद्ध त्रयोदशीला झाला. हा दिवस महावीर जयंती म्हणुन साजरा होतो. या दिवशी देशभरातील महावीर मंदिरात सजावट करतात, महावीरांची मिरवणुक काढली जाते. जैन धर्मीय उत्साहाने हा दिवस साजरा करतात.
![](https://marathigoshti.com/wp-content/uploads/2021/05/akash.jpg)
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take