You are currently viewing चिंता करितो विश्वाची

चिंता करितो विश्वाची

समर्थ रामदासांचे मुळ नाव नारायण ठोसर. त्यांचा जन्म जालन्यातल्या जांब गावी झाला. 

ते लहान असताना सर्व लहान मुले लपंडाव खेळत होती. नारायण कुठेतरी जाऊन लपला तो कोणालाच सापडला नाही. सर्व मुलांचे राज्य देऊन झाले, त्यांचा खेळ संपला तरी नारायण काही सापडला नाही. 

मुलांनी नारायणाच्या आईला जाऊन सांगितले. त्याची आई फार चिंतेत पडली. तिने सर्व गावात नारायणाला शोधले. पण तो कुठेच सापडला नाही. 

त्या काळी मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंवर फार अत्याचार करत असत. त्यांचे सैनिक मुलं बायका जबरदस्ती पळवुन नेऊन त्यांना बाटवत असत. 

आपल्या नारायणाला कोणी असं पकडुन तर नेलं नाही ना, या काळजीने नारायणाची आई रडायला लागली. 

गावातल्या लोकांनी त्यांना शांत केले आणि पुन्हा घरी शोधायला सांगितले. 

आई घरी गेली आणि सगळीकडे पुन्हा शोधले. शेवटी नारायण एका मोठ्या कपाटात सापडला. तो खेळ सुरु झाल्यापासुन जो तिथे लपला तो बाहेर आलाच नव्हता. त्याची तिथेच तंद्री लागली होती. 

नारायणाच्या आईचा जीव भांड्यात पडला. त्यांनी नारायणाला जवळ घेऊन मिठी मारली आणि भरपुर मुके घेतले. आपला मुलगा ह्या कपाटात इतका वेळ काय करत बसला असेल हे त्यांना कळेना. त्यांनी नारायणाला विचारले. नारायणाचे उत्तर विलक्षण होते. 

“चिंता करितो विश्वाची”

म्हणजे एवढ्या लहान वयाचा नारायण कपाटात बसुन विचार करता करता सगळ्या जगाबद्दल विचार करायला लागला होता. 

आता ह्या गोष्टी ऐकुन नवल वाटले तरी अनेक थोर लोकांच्या अशाच लहानसहान गोष्टींतुन येणाऱ्या प्रचितीमुळेच हि म्हण पडली असावी “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा