Site icon मराठी गोष्टी

कोकिळा गौरीची कहाणी

religion, india, wallpaper

कोकिळा गौरी, तुमची कहाणी ऐका. 

शंकराची अर्धांगिनी दाक्षायणी ही दक्ष प्रजापतीची कन्या. प्रजापतीनं महायज्ञ केला. त्यासाठी देव-गंधर्वांना वगैरे बोलावले; पण शंकरांना व दाक्षायणीला बोलावले नाही. 

शंकर ‘जाऊ नको’ म्हणत असताही दाक्षायणी तशीच यज्ञ मंडपाच्या दाराशी आली. दक्षानं तिचं स्वागत केलं नाही. तिचा अपमान झाला; म्हणून ती संतापून गेली. धावत जाऊन तिनं यज्ञकुंडात उडी घेतली व दाक्षायणी जळाली. 

नारदानं शंकराला ती वार्ता कळवली. शंकरानी रागाने जटा शिलेवर आपटली. शिळेतून वीरभद्राची भयंकर मूर्ती प्रगटली. 

शंकरांनी वीरभ्रदाला त्या अपमानाचा सूड घेण्यास सांगितले. वीरभद्र व गणपतीही यज्ञमंडपात आले. यज्ञाचा विध्वंसच केला. देव गंधर्वांचे हात-पाय तोडले. मंडप फाडला. इंद्राचं नाक कापलं आणि दक्षाचं शिर छाटलं. सारे देव शंकराला शरण गेले. 

शंकरानी सारे पूर्ववत् केले. देव-गंधवांचे हात-पाय जोडून दिले. इंद्राला नवे नाक जोडून दिले. दक्षाला बोकडाचं शिर लावलं. 

संजीवनीच्या प्रयोगानं दाक्षायणीला पुन्हा जिवंत केलं. तेव्हा “गौरी, घोर अपराध केलास. यज्ञात विघ्न करून आत्मघात केलास. या पापाचं फळं म्हणून तू पक्षिणी होशील. काळी कुरूप कोकिळा बनून पृथ्वीवर फिरशील!” 

काकुळतीला येऊन गौरी म्हणाली, “कोकिळा जरी झाले, तरी मला मान पाहिजे ! माझ्या पूजेमुळे स्त्रियाचं कल्याण होईल, असा वर द्यावा; तरच सार्थक होईल.”

शंकर म्हणाले, “तथास्तु ! कोकिळागौरी व्रताला ज्या स्त्रिया मानतील, त्यांना सौभाग्य लाभेल. अठरा वर्षांनी अधिक आषाढ महिना येतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेपासून महिनाभर कोकिळा व्रत करावं. श्रावणी पौर्णिमेला त्याचं उद्यापन करावं. दहा हजार वर्षे तू कोकिळा म्हणून राहशील. नंतर उमा-पार्वती माझी पत्नी होशील.”

गौरी कोकिळा होऊन भुर्रकन उडून गेली. वसंत ऋतू आल्यावर विंध्याचली उत्तरेला आम्रवृक्षावर कुहू कुहू मधुर स्वर करू लागली. 

कोकिळा व्रत कसं करावं, हे वसिष्ठांनी सांगितलं. शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमालेनं ते प्रथम केलं. श्रीकृष्णानं द्रौपदीला त्या व्रताची माहिती दिली. कोकिळागौरीचं व्रत निष्ठेनं केल्यानं गौरी कोकिळा प्रसन्न होईल. अखंड सौभाग्य लाभेल.

Exit mobile version