Site icon मराठी गोष्टी

अधिक मासाची कहाणी

एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषि-मुनी बसले होते. त्या ठिकाणी महर्षी व्यास आले. ते म्हणाले, आता पुरुषोत्तम महिना येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्मे करावयाची आहेत. 

ऋषि मुनींना आश्चर्य वाटले. ऋषि-मुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली.

महर्षी व्यास म्हणाले, “चंद्रसूर्याच्या गतीमुळे दर वर्षी दहा दिवसांचा फरक पडत असतो; म्हणून दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरून कालमेळ बसवलेला आहे. तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास होय.”

महर्षी व्यास म्हणाले, ही तेराव्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली. 

नारद पृथ्वीवर फिरत होते. त्या वेळी त्यांना अनेक दुःखी माणसे दिसली. पृथ्वीवरील माणसांचे दुःख दूर कसे करावे, याचा विचार करीत नारद वैकुंठाला आले. भगवान विष्णू ध्यान करत होते. 

नारदांनी विष्णूंना विचारले, “आपण कशाचे ध्यान करता ?” 

विष्णू म्हणाले, “नारदा, अधिक मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्याचं मी ध्यान चिंतन करत आहे. त्याच्या कृपाप्रसादाने अनेकांची दुःखे कमी होतील. त्या अधिक मासाचे अतिशय महत्त्व आहे.”

नारद म्हणाले, “देवा ! मृत्युलोकातील माणसे दुःखी आहेत. त्यांचे दुःख नाहीसे करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण सांगावी. आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवीन आणि त्यांची दुःखे कमी होऊ शकतील.” 

श्रीविष्णू म्हणाले, “चंद्र-सूर्याच्या गतीत जो फरक पडतो, त्याचा मेळ बसवण्यासाठी दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते. म्हणून त्याला मलीन महिना किंवा मलमास म्हणतात. या महिन्यात लग्नकार्यादी मंगलकार्ये करीत नाहीत. मी त्या मलीन अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचे दिव्यरूप प्राप्त करून दिले. गोपालकृष्णाने वर दिला की, या महिन्यात तीर्थस्नान, व्रत, नियम वगैरे धर्माचरणाचे पुण्य कर्मे करतील, त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल. त्यांचे जीवन सार्थक होईल, त्यांचे मनोरथ पूर्ण होतील.

एके दिवशी पांडवांनी ‘कोणते व्रत करावे,’ म्हणून श्रीकृष्णास विचारले. 

त्या वेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले, “अधिक मासातील व्रत करावे. नियम पाळावेत व पुरुषोत्तमाची सेवा करावी.” 

श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्मे केली. त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले.

अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्मे करून जीवन सुखदायी बनविले. अधिक मासात कळत-नकळत जरी पुण्य घडले, तरी भगवान श्रीकृष्ण त्या भाविकाचे कल्याण करतात. त्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यकर्म करावे. 

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सफल संपूर्ण.

Exit mobile version